भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा केली होती. ते पुन्हा आले मात्र महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदी बसावं लागलं.अडीच वर्षांनी शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे आपल्या 40 आमदारांसह भाजपला येऊन मिळाले. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना अचानक एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करण्यात आलं. मात्र, यावेळी देवेंद्र फडणवीस नक्की मुख्यमंत्री होतील असे भाकीत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वर्तवले आहे.
फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असं भाकीत गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रातील लाखो भावीक भक्तांचे श्रद्धास्थान गहिनीनाथ गडाचे महंत यांच्या भविष्यवाणीने खळबळ उडाली. गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याप्रसंगी बोलताना त्यांनी हे भाकीत केले.
राज्यात सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे महायुती सरकारचं नेतृत्व आहे. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदी आहेत. विधानसभा तोंडावर आली असून तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आमच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय लढली जाण्याची शक्यता आहे.