यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला होता. भाजपनं यावेळी प्रीतम मुंडे यांना तिकीट न देता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा या मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना संधी देण्यात आली. गेल्यावेळी प्रीतम मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.
मात्र यावेळी परिस्थिती वेगळी होती, पंकजा मुंडे यांना मराठा गावांमध्ये प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या गाड्या अडवल्या गेल्या, घोषणाबाजीला सामोरं जावं लागलं. मराठा आंदोलनाचं केंद्र अंतरवाली सराटी होतं पण त्याची सर्वाधिक धग जाणवत होती ती बीडमध्ये. मराठा आंदोलकांवरील लाठी हल्य्यानंतरचा आक्रोष, आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली जाळपोळ, मराठा समाजाच्या प्रचंड सभा, गावागावातील मंदिरावर मराठा उमेदवारालाच मतदान करण्यासाठी घेतल्या गेलेल्या शपथा, बाराबलुतेदारांपैकी एक असलेल्या न्हावी समाजाच्या दुकानांची झालेली तोडफोड, वाजवा तुतारी हटवा वंजारी या घोषणांनी बीडच्या निवडणुकीत टोकाचं ध्रुवीकरण झालं, अशा एकना अनेक घटनांनी बीडमध्ये अभूतपूर्व असं जातीय ध्रुवीकरण झालं.
मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आणि भाजप नेत्यांची फळी पंकजा मुंडे यांच्या मदतीला होती. हा जिल्हा सुरुवातीपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून आता कोण बाजी मारणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.