राज्य शासनाच्यावतीने जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. यात जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील पदासाठी परिक्षा पार पडली असली तरी, काही संवर्गातील परिक्षा अद्याप झालेली नाही. तसेच झालेल्या परिक्षांचा निकाल देखील जाहीर झालेला नाही. त्यामुळे या परिक्षा व निकालाला लोकसभा निवडणुकीचा अडसर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आचारसहिंता लागल्यानंतर परिक्षा व निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. यातील ७५ हजार पदांची भरती १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, अनेक शासकीय विभागांच्या भरतीची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही.
तर, ज्या विभागांच्या परिक्षा झाल्या आहेत, त्यातील काही विभागांचे निकाल रखडले आहेत. काही विभागांनी जाहीर केलेले निकालावर आक्षेप आल्याने वादात सापडले आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून ५ ऑगस्ट २०२३ रोजी एकूण २० संवर्गामधील १०३८ रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती.
त्यानुसार २६ डिसेंबर २०२३ पर्यंत १५ संवर्गाकरिता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असून कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक ४० टक्के (पुरुष), आरोग्य सेवक ५० टक्के (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या ५ संवर्गांच्या परीक्षा नियोजित असून शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत.
१५ संवर्गातील परिक्षा आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्यात. यातील ७ संवर्गातील परीक्षांचे निकाल शासनाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाही.
याशिवाय ५ संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले नाही. यातच मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकांची आचारसहिंता जाहीर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे