पुणे |
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समिती, सकल सुतार समाजाच्या वतीने रविवार २४ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपस्थीत राहणार असून या मेळाव्याचे स्वागाध्यक्षपदी आ. संजय रायमुलकर असून , या महामेळाव्याला राज्यतील ३६ जिल्ह्यातील सुतार समाज बांधव सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहणार आहेत, असे विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे विद्यानंद मानकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
या पत्रकार परिषदेस हनुमंतराव पांचाळ, पिजी सुतार, दिलीप अकोटकर, भगवान राऊत आणि प्रदीप जाणवे आदी उपस्थित होते.
यावेळी मेळाव्याची माहिती देताना मानकर म्हणाले की, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता फुटवाले धर्मशाळा, 332 प्रदक्षिणा रोड, संत आळंदी देवाची, पुणे येथे सुतार समाज महामेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याचे माध्यमातून राज्यातील सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी आर्थिक वर्षांत किमान ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना सुतारांच्या पाल्यांना विना अट लागु करावी, पिढ्यान पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक, किल्ले, महाल, वास्तू, तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. या ऐतिहासिक वास्तूद्वारे राज्य अथवा केंद्र सरकार महसूल जमा करते. त्या महसूलातुन किमान २५% महसूल (रॉयल्टी) वाटा पारंपारीक कारागिरांना देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे मुख्य प्रशासकीय समन्वयक विद्यानंद मानकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
सुतार समाजाचा पारंपारीक व्यवसाय हा लाकडावर अवलंबून असल्याने जसे वडार समाजास दगड या गौण खनीजास रॉयल्टी मुक्त करून पारंपारीक पद्धतीने व्यवसायास मुभा दिली तशी लाकडा संबंधी परवानगी अट सुतार समाजासाठी रद्द करावी. त्यास अनुसरून क्लस्टर निर्माण करून समाज व्यवसायास औद्योगिक चालना मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात भूखंड प्रदान करण्यात यावेत, कारागिरांच्या मुले व मुलींसाठी विशेष आरक्षण ठेवून जागा राखीव करण्यात याव्यात. पिढ्यानपिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक, किल्ले, महाल, वास्तू, तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. असेही विद्यानंद मानकर यांनी सांगितले.