नांदेड |
जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील पत्र उत्तर सभागृहात मांडलं. तसंच निलंबीत पोलीस अधिकारी तसंच केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गुन्हे मागे न घेतल्यास 24 तारखेनंतर मराठा समाज काय आहे ते दाखवून देण्याचा सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे म्हणाले, बघू २४ डिसेंबपर्यंत सरकार काय करतंय? त्यानंतर महाराष्ट्र काय असतो आणि त्या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे लक्षात येईल. थोडं धीर धरा तुम्ही किती पलट्या मारत आहात, आरक्षणाचा विषय तुम्ही का घेत नाही. आमचं बारीक लक्ष आहे तुमच्याकडं तुम्ही काय करता आहात? तुम्ही काय करणार? आम्हाला आश्वासनं काय दिली? गुन्ह्यांच्याबाबत काय दिली? अटकेच्याबाबत काय दिलं? मराठा आरक्षणाबाबत काय आश्वासनं दिली? याकडं आमचं बारकाईनं लक्ष आहे.
फडणवीस आपलं स्टेटमेंट बदलतील त्यांच्या मूळ भूमिकेवर शंभर टक्के येतील. त्यांनी एकट्याच्या दबावात येऊन जर आपलं स्टेटमेंट बदललं असेलं पण ते आपल्या मुळं भूमिकेवर येतील. नाही आले तर त्यांना परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. पण हे काय असेल ते तुम्हाला २४ डिसेंबरनंतर लक्षात येईल, अशा शब्दांत मनोज जरांगेनी अल्टिमेटम देताना फडणवीसांना इशारा दिला आहे.
आरक्षण मिळण्याची चांगली संधी
मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू असून हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आता आरक्षण मिळण्याची चांगली संधी आहे, आरक्षण न मिळाल्यास आम्ही दहा वर्षे मागे जाऊ, त्यामुळं समाजातील लोकांनी संघटित होऊन समाजाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड येथील सभेत बोलताना केलं.