-
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सरकारी कर्मचाऱ्यांना टेन्शन
बदली झालेल्या ठिकाणी हजर न झाल्यास महिला अधिकाऱ्याला अटक करा, असे आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय सुरक्षा दलाला दिले आहेत. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण आदेशामुळे यापुढे बदलीच्या ठिकाणी रुजू न होण्यासाठी सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठोस कारण नसलेली सबब देता येणार नाही.
या महिला अधिकारीच्या बदलीचे आदेश 17 एप्रिल 2023 रोजी निघाले. तरीही त्या रुजू झाल्या नाहीत. तीन महिन्यांनी पुन्हा त्यांना रुजू होण्यास सांगितले. रुजू न होता त्या वैद्यकीय रजेवर गेल्या. अखेर 30 ऑक्टोबर 2023 रोजी सुरक्षा दलाने त्यांच्या अटकेचे आदेश जारी केले. बेकायदेशीरपणे गैरहजर असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. ही महिला अधिकारी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू न झाल्यास सुरक्षा दलाने अटकेच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
अश्विनी शैलेश आयबद, असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. सामान्य राखीव अभियांत्रिकी दलात अश्विनी कार्यरत आहेत. सीमा रस्ते महासंचालक यांच्या अखत्यारीत हा विभाग येतो. अश्विनी यांची आसामहून चंदीगड येथे बदली करण्यात आली. ही बदली अनुकंपा दाखवण्यात आली. त्यावर अश्विनी यांचा आक्षेप होता.
ही बदली अनुकंपा न दाखवता सामान्य बदली दाखवावी, असे अश्विनी यांचे म्हणणे होते. तसा दावा करत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. सुट्टीकालीन न्यायालयासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्या. संदीप मारणे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने वरील आदेश देत अश्विनी यांची याचिका फेटाळून लावली.
महिला अधिकाऱ्याचा दावा
पुणे येथे बदली द्यावी, अशी मागणी अश्विनी यांनी केली होती. तरीही त्यांना जाणीवपूर्वक चंदीगड येथे बदली देण्यात आली. सेवेतील संपूर्ण कार्यकाळात केवळ दोनच वेळा अनुपंपा बदली मिळते. या बदलीला स्थगिती न मिळाल्यास अश्विनी यांना अटक होऊ शकते, असे अॅड. रोहित बिडवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
याचिकेतील विनंती
अश्विनी यांची आई पुण्यात असते. आईला कर्करोग आहे. तिची शुश्रुषा करण्यासाठी त्यांना पुण्यात बदली हवी होती. चंदीगडची बदली अनुपंपा दाखवल्यास भविष्यात पुण्यासाठी अनुपंपा बदली मागता येणार नाही. चंदीगडची बदली अनुपंपा दाखवू नये, अशी त्यांची विनंती होती.
न्यायालयाचे निरीक्षण
अश्विनी यांनी स्वतःच अनुपंपा बदली मागितली होती. बदलीसाठी विभागाने त्यांना पर्याय दिले होते. त्यावेळी त्यांनी पुणे न निवडता चंदीगडची निवड केली. तशी कागदोपत्री नोंद आहे. आता अश्विनी घुमजाव करू शकत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
या याचिकेला विभागाकडून विरोध करण्यात आला. अश्विनी यांनीच अनुपंपा बदली मागितली होती. बदली झाल्यापासून त्या बेकायदापणे गैरहजर आहेत. त्यांच्या अटकेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यांची कोणतीही मागणी मान्य करू नये, अशी विनंती विभागाकडून अॅड. वाय. आर. मिश्रा यांनी केली.