केंद्र शासनाची आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महाराष्ट्र शासनाच्या म. ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्राच्या कक्ष प्रमुखपदी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना केंद्रातून परत महाराष्ट्रात बोलावले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव म्हणून केलल्या अनुभवाची व पुण्याईची शिदोरी गाठीशी असलेल्या ओमप्रकाश शेटे यांच्याकडून सर्वसामान्य व गरजवंद रुग्णांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
भाजप सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची सामाजिक प्रतिमा घराघरात पोहोचवण्याचे काम या कक्षानं केलं होतं. केवळ साडेसाचर वर्षात दिवसरात्र काम करत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जास्त निधी सर्वसामान्य रुग्णांच्या उपचारासाठी पोहोचवण्याचे काम केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रुग्णसेवेचा संदेश घेऊन राज्यभर आरोग्य शिबिरे भरवली होती. अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सरकारची रुग्णसेवा पोहोचवली होती.
कोण आहेत ओमप्रकाश शेटे?
तत्कालीन मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख राहिलेले डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे सध्या केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयामध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षात असताना धर्मादाय व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता व धर्मादायक किंवा महात्मा फुले योजनेतील लाभार्थ्यांना करोडो रुपयांचा लाभ झालेला आहे. डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांना राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी या नवीन अभियानाची धुरा देण्यात आल्याचं समजते.
डॉक्टर शेटे यांनी 2014 ते 2019 या कार्यकाळात अतिशय भरीव कामगिरी केली होती. त्यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पैशाअभावी किंवा उपचाराअभावी सामन्य माणसाचा जीव जाता कामा नये, हा देवेंद्र फडणवीस यांचा संदेश राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत नेला.
डॉक्टर शेटे यांची खासियत म्हणजे सर्वपक्षीय संबंध, कोणताही पक्षीय भेदाभेद न करता, कुठलीही शिफारस न घेता प्राणाणिकपणे काम करणे. सर्वसामान्य रुग्णांना जात, धर्म,पंथ विरहित न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला. त्यामुळेच त्यांनी राज्यभरात देवदूत म्हणून ओळख आहे.