राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढीसाठी कंबर कसली असतानाच आता अजित पवार गटानेही पक्ष वाढीसाठी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यासह राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची जबाबदारी सोपवली आहे.विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा,सांगली व सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.यामुळे भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार विरूद्ध अजित पवार असा थेट सामना रंगणार आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून फुटून ९ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रभर दौरे करण्यास सुरूवात केली आहे.काही जिल्ह्यात त्यांनी स्वाभिमानी सभा घेत त्यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही पक्ष वाढीसाठी कंबर कसली असून, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पक्ष वाढीसाठी ९ मंत्र्यांसह कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी निश्चित केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड समजला जातो.याच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,सातारा,सांगली व सोलापूर या जिल्ह्यात पक्ष वाढीची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्यामुळे भविष्यात अजित पवार विरूद्ध शरद पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर या विदर्भातील जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर,मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला,वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा,हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर,मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर,अनिल पाटील यांच्यावर जळगाव,धुळे,व नंदुरबार,धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.