पुणे |
राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा घेरले आहे. त्यावेचळी अजितदादांना सत्तेत घेण्याच्या भाजपच्या भूमिकेवरही राज यांनी नाराजी मांडून, भाजपच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. ‘तुरुंगात टाकण्याची भाषा बोलून दाखवली आता त्यांना सत्तेत कसे घेतले, त्यांच्याकडेच तजोरीच्या चाव्या कशा दिल्या, अशी विचारणा करीत राज यांनी भाजपला सुनावले.तर राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांना भाजपने सत्तेत घेतले, असा निशाणा साधत अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न राज यांनी केला. त्यामुळे राज आणि अजितदादांमधील जुना राजकीय संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने राज यांनी त्यांच्यावर घणाघाती टीका करत राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, तर दुसरी टीमही लवकरच सत्तेत जाईल, असे वक्तव्य केले. त्यांच्या या दाव्यामुळे राजकारणात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे. राज यांनी राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत तर एक गट विरोधात असल्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“पंतप्रधानांनी 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतरही युत्या-आघाड्या केल्या जातात. राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली, तर दुसरीही लवकरच जाईल. हे सर्व मिलीभगत आहे. अद्यापही अजित पवारांच्या होर्डिंगवर शरद पवारांचा फोटो आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच राज यांनी आघात केला.
तर अजित पवारांना जेलमध्ये टाकणार म्हणणाऱ्यांनीच त्यांच्याशी युती केली, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपसह अजितदादांनाही घेरले. त्यामुळे आता यावर भाजप आणि राष्ट्रवादी राज यांना काय प्रत्युत्तर देते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.