पुणे |
तलाठी या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि.26) सुरू झाली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांत एकूण 4 हजार 644 तलाठ्यांचे पदे भरली जाणार आहे. या परीक्षेसाठी दोन दिवसातच तब्बल 30 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
तलाठी भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालकांनी तलाठी भरतीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली. तलाठी पद भरतीसाठी उमेदवारांना दि.17 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चार वाजेपर्यंत 30 हजार उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान अर्ज भरण्यासाठी आणखी काही दिवस असल्याने येत्या काही दिवस तलाठी पदासाठी अर्ज करण्यांच्या संख्येत आणखी वाढ होऊन ही संख्या काही लाखात जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
येथे करता येणार अर्ज
उमेदवारांची वयोमर्यादा मोजण्यासाठी 17 जुलै 2023 हा दिनांक असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक हजार रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. https:// mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.