मुंबई |
नैतिकता कोणी जपली हे सांगण्याची गरज नाही. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. शिवाय, व्हीप लावायला तुमच्याकडे माणसं किती आहेत? असा खोचक टोलाही शिंदेंनी ठाकरेंना लगावला आहे. धनुष्यबाण आणि बाळासाहेबांची विचारधारा वाचवण्याचे काम आम्हीच केले. असं ही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अखेर सत्याचा विजय झाला. आजचा न्यायालयाचा निकाल लोकशाहीला अपेक्षित असा. सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना कोर्टाने कालबाह्य केले आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे, देशात कायदे नियम आणि संविधान आहेत, त्याबाहेर जाऊन कुणालाही काहीही करता येणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो. आज आमच्या सरकारच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले आहे. सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे असं म्हणून काही जण आपली पाठ थोपटून घेत होते. मात्र त्यांना न्यायालयाने चपराक दिली आहे.”
“अपात्रतेचा अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच हे न्यायालयाने कायम ठेवलंय. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता दिलेली आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेचा आधार देत राजीनामा दिल्याचं म्हटलं. पण त्यांचं सरकार अल्पमतात होतं हे स्पष्ट होतं. आमचे सरकार कायदेशीर, घटनेला धरूनच. ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकार बनवून बाळासाहेबांच्या भूमिकेचा आदर आम्ही केला आहे, बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम आम्ही केले, तुम्ही तो गहाण ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण बहुमताच्या सरकारवर शिक्कामोर्तब केले आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो.” अस शिंदे म्हणाले.