माजलगाव |:
क्षुल्लक गोष्टीवरुन वाद होऊन त्याच पर्यवसण हाणामारीत होण्याच्या घटना नेहमी ऐकू येतात. मात्र, शेतातुन जाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन वाद घालत अवघ्या 15 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय 15 वर्षे) असं मृत मुलाचं नाव आहे. या प्रकरणी कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात ही घटना घडली आहे. गुलाम मोहम्मद शेख हा अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा आरेपीच्या शेतातून येणं जाणं करत होता. याचा आरोपीच्या मनात आधीपासुन राग होता. घटनेच्या दिवशीही तो त्यांचा शेतातुन गेला. यावरुन वाद घालत आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगला.
शेतात जाण्यावरुन घातला वाद
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुलाम मोहम्मद हा त्याच्या भावंडासोबत घरासाठी सरपण आणण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात अडवुन शेतातुन का जातोस असं म्हणत वाद घातला तसेच त्याला बेदम मारहाणही केली. तसेच त्याचा गळा आवळुन त्याची हत्या केली. यावेळी त्याच्या भावडांनी लगेच घर गाठलं. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. परिसरातील एका शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकावलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश
मोहम्मद हत्येची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.