अंबाजोगाई |
अंबाजोगाई – मोरफळी ही बस दि.१८ एप्रिल मंगळवारी दुपारी दोन वाजता बुट्टेनाथ घाटात पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगारातून अंबाजोगाई – मोरफळी (एम. एच. २०-३२०) ही बस अंबाजोगाई येथून येल्डा मार्गे मोरफळीकडे निघाली होती. बस शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या
बुट्टेनाथ घाटात उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस पलटी झाली. या बस मधून जवळपास ६० ते ७० प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने जागेवरच वळण घेतले त्यामुळे बस दरीत कोसळण्यापासून बचावली. व अनर्थ टळला. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. घटनेची माहिती मिळताच पोलिस महसूल प्रशासनाच्या वतीने निरीक्षक विनोद घोळवे, नायब तहसीलदार गणेश सरोदे व पुरवठा अधिकारी मिलिंद गायकवाड, यांच्यासह अनेकांनी धाव घेतली.व प्रसंगावधान राखून तात्काळ मदत केली.