वडीगोद्री |
”मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध करून त्रास दिला. तसेच आमच्यावर हल्ला केला, त्यांना समाज विधानसभेत पाडणार आहे. याबाबत समाजाने गाव पातळीवर निर्णय घ्यावा,” असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आज पत्रकार परिषदेमध्ये केले.
जरांगे म्हणाले की, संभ्रम असण्याचे कारण नाही. आपण आरक्षणाकरिता एकत्रित आलो आहे. काही स्वार्थी मुद्दाम संभ्रम निर्माण करत आहेत, ज्यांना पाडायचे त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना आणा, असे या अगोदर सांगितले आहे. जे आपल्या विचाराचे आहेत, ज्यांनी आरक्षणाकरिता मदत केली, मागणीशीही सहमत आहेत, जे या पुढे आपल्याला मदत करतील, अशा उमेदवारांकडून लेखी घ्यावे.
त्यांचा व्हिडिओ तयार करावा. हा निर्णय समाजाने गाव पातळीवर घ्यावा. तसेच योग्य उमेदवारांना निवडून द्यावे, असे जरांगे यांनी सांगितले. राज्यात कोणालाही पाठिंबा दिला नाही. मला पूर्ण वेळ आरक्षण व आंदोलनाकरिता द्यायचा आहे. आंदोलनाची तयारी सुरू आहे. आरक्षण हेच उद्दिष्ट आहे. आरक्षणाला ज्यांनी विरोध केला, ते निवडून येता कामा नये. मराठा समाजाला विरोध करणारा पक्ष कोणता आहे, हे समाजाला माहिती आहे. आरक्षणाची वज्रमूठ परत बांधून जोमाने काम करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
पुन्हा उपोषण करणारच!
”कोणाला पाडा, कोणाला आणा याबाबत काही देणेघेणे नाही. मात्र, जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांच्या पाठीमागे अजिबात राहू नका. कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी आरक्षण दिले तर ठीक, अन्यथा पुन्हा उपोषण करणारच,” असा इशारा मनोज जरांगे यांनी रविवारी गेवराईत दिला.