मनोज जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत सहावेळा उपोषण केलं आहे. मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण मिळण्याची आशा आहे. तसं घडलं नाही तर मग भाजपाची सगळी गणितं बिघडतील असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी आंदोलनात उतरलेलो नाही. माझा एकच स्वार्थ आहे माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे. बाकी मनोज जरांगे मुख्यमंत्री वगैरे या सगळ्या लोकांच्या भावना आहेत. मी राजकारणासाठी नाही तर समाजासाठी या सगळ्यामध्ये उतरलो आहे. योग्य वेळ आल्यानंतर योग्य संधी येते तशी आता आली आहे. गोरगरीब मराठे, दलित, ओबीसी, मुस्लीम यांनी सगळ्यांच्या एकजुटीची लाट आली आहेत. यानंतर ही लाट येणार नाही त्यामुळे हीच संधी आहे. गोरगरीबांना आरक्षण मिळण्याची हीच संधी आहे.
दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या, त्याला आम्ही काही करू शकत नाही. नारायणगडावर होणार दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत. देवेंद्र फडवणीस आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. आम्हाला त्याची खात्री आहे. मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणूक घेणार नाहीय. निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, नाहीतर फडवणीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
भाजपामधील मराठ्यांनी पण हाच विचार करावा आणि फडणवीस यांना सांगा. नाहीतर माझा नाईलाज आहे, तुम्ही तुमच्या नेत्याला फडवणीस याना समजून सांगा. फडवणीस निवडणूक लागण्याअगोदर मागण्या मान्य करा, मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. तुमचे लोक आमच्याकडे येतात. फडवणीस याना हिताचे सांगतो, मराठ्यांना डावलू नका. तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर सुपडा साफ होईल, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.