बीड |
बीड शहरातील नगररोड वरील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय ईमारत, न्यायालय पंचायत समिती आदि शासकीय कार्यालयासमोर रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी असलेली हिरवीगार झाडे उन्हाळ्यात विविध शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना आधार देतात. नगर बीड महामार्गाचे काम सध्या सुरू आहे रस्त्याला अडचण निर्माण होत आहे या नावाखाली शेकडो झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे.मात्र बीड शहरातील मुख्य रस्त्यावर उभा असलेल्या वीज पुरवठा करणारे विद्युत रोहित्र,खांब नागरीकांनी वाहतुकीस अडथळा होऊन अपघाताची शक्यता असतानाही हटवुन रस्ते मोकळे केले जात नाहीत याबाबतीत धृतराष्ट्राची भुमिका घेणा-या अंध जिल्हा प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी उपस्थित केला आहे.
बीड शहरातील अतिक्रमणे,बांधकामे आदि मुळे मोठमोठे रस्ते अरुंद झालेले आहेत.त्यातही काही ठिकाणी उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड,तुळजाई चौक, राजीव गांधी चौक, बार्शी नाका आदि ठिकाणी रस्त्याच्या मधोमध विद्युत रोहित्र, विद्युत खांब,फोनची डिपी आदि वाहतुकीस अडथळा व अपघातास निमंत्रण देणारी असुन नागरीकांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार करून देखील नगरपालिका कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.त्यामुळे याठिकाणी होणारा वाहतुकीस अडथळा व अपघाताकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांमध्ये नाराजी आहे.
आंदोलनकर्ते यांचा आधार हिरावला
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते, नागरीक संघटना, विविध मागण्यांना घेऊन आंदोलने, उपोषणे, निदर्शने करतात.काहीवेळा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आठवडाभर आंदोलन चालते. वृक्षतोडीमुळे त्यांचा आधार गेला असुन उन्हाळ्यात त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.तसेच झाडे तोडल्यानंतर पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोणती योजना आखली आहे.याची माहिती वृक्षप्रेमींना दिली पाहिजे. तोडण्यात आलेल्या अनेक झाडांपैकी अनेक झाडे शासकीय कार्यालयाच्या संरक्षण भिंतींच्या आत असतानाही तसेच या झाडांमुळे रस्ता कामासाठी कोणताही अडथळा निर्माण होत नसतानाही झाडांची सर्रास कत्तल करण्यात येत आहे.केवळ या झाडांच्या फांद्या रस्त्यावर येत असल्याने तोडण्यात आली आहेत.प्रशासकीय कार्यालयातील आधिका-यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर